१९२७ साली महाडचा
सत्याग्रह करण्याचे ठरले. पण सत्याग्रहासाठी लागणारा पैस उभा करण्याचे आव्हान उभे
ठाकले होते. बाबासाहेब तेंव्हा हायकोर्टात
बॅरिस्टर म्हणून काम करत. चवदार तळ्याच्या सत्याग्रहास निधी मिळविण्यासाठी
कोर्टातीला ओळखी पाळखीच्या बॅरिस्टर लोकाना भेटून आर्थिक मदत करण्यास विनंती करत
पण कुणी या कामासाठी पैसेच देईनात. हताश झालेले बाबासाहेब हायकोर्टाच्या लायब्ररीत
एका कोप-यातल्या टेबलावर बसून चिंतामग्न झाले होते. त्यांच्या सोबत रोज गप्पा मारणारे एक सहकारी
श्री. मोतीराम तळपदे बाबासाहेबांची ही अवस्था पाहून चकीत होतात नि चिंतेचे कारण
विचारतात. बाबासाहेब आपली अडचण बोलुन दाखविल्यावर तळपदे आपल्या एका मित्राशी बोलून
सायंकाळी भेट घडवून आणतात.
ठाकूरदास येथील विविधवृत्त
च्या ऑफिसात ठरल्या प्रमाणे ज्या मित्राची ओळख करुन देतात त्याचे नाव श्री.
रामचंद्र काशीनाथ तटणीस. बाबासाहेबांच्या उदात्त कार्यास हातभार लागलाच पाहिजे
म्हणून तटणीस लगेच कित्येकाना फोन लावतात व मदत मिळू शकेल का याची चाचपणी करतात.
पण सगळीकडून नकार मिळतो.
हार न मानता तटणीसानी
ओळखितील नाटक कंपन्यांशी संपर्क केला. ललित कलादर्शनचे श्री. बापूराव पेंढारकर
(व्यंकटेश बळवंत) यानी मदत देण्यास तय्यारी दर्शविली. पण त्यानी अशी अट घातली की आम्ही
जे पैसे देणार ते सत्याग्रहासाठी देतोय हे बाहेर सांगु नका. समाज आमच्यावर पेटून
उठेल. तुमच्या शैक्षणीक संस्थाना दान देतोय असे कागदो पत्री दाखवा. म्हणजे आमची
अडचण होणार नाही. बाबासाहेबानी पेंढारकरांची ही अट मान्य केली व त्यांच्याकडून
आर्थिक मदत घेतली.
त्या नंतर पेंढारकरांचा
कित्ता गिरवत नाटक कंपन्यातील अनेक मान्यवर मदत देण्यास पुढे सरसावले. सखाराम
नारायन काजरोळकर यानी नाटकाचा एक खेळ बहिष्कृत हितकारणीसाठी केला व रु. १००/-
मिळालेले उत्पन्न बाबासाहेबाना दिले. श्री. निर्मळ लिंबाजी गंगावणे यानीही एक खेळ आर्थिक
मदतीसाठी दिला. रु. १५०/- त्यांच्याकडून मिळाले. अशा प्रकारे कलाकार मंडळीनी
बाबासाहेबाना मदत करण्यास पुढाकार घेतला.
हा हा म्हणता ही बातमी पठ्ठे
बापूराव (श्रीधर कृष्ण कुलकर्णी) यांच्या कानावर गेली. हे त्याकाळातले
नावाजलेले तमासगीर होत. यांच्या तमाशात महारांच्या देखण्या बायका काम करत. त्यांच्या
तमाशातील पवळाबाई नावाची महारीन (गाव-हिवरगाव, संगमनेर) अत्यंत प्रसिद्ध
होती. ती तबाजी महाराची मुलगी होती. अशा प्रकारचे अनेक महारीनी त्यांच्या तमाशात
काम करुन नाव लौकिकास गेल्या होत्या. बाबासाहेबाना मदत करण्यासाठी १० सप्टे १९२७
रोजी पठ्ठे बापूराव त्यांच्या ऑफिसात येतो. सोबतीला दोन सुंदर ललना, दोघींच्याही
पायांत तोडे, अंगावर दागिने. या दोन बाया बापूरावच्या दोन बाजूला व हा मधे अशी
वरात बाबासाहेबांसमोर उभी होते. बापूरावांचा वेषही मोठा थाटाबाटाचा होता. खांद्यावर
रेशीम धोतर, लांब दाढी, पायात पंप शू, डोक्याला जरतारी कोल्हापूरी फेटा, हातात व
गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असा एकंदरीत वैभवी थाट होता.
पठ्ठे म्हणतो, “बॅरिस्टर,
मी तुम्हाला पुर्ण चार खेळाचे पैसे मदत म्हणून देण्यास आलो आहे. आपण माझ्या मदतीचा
स्विकार करावा.” बाबासाहेब मदत घेण्याचे
नाकारतात. "कलेच्या नावाखाली बायका नाचविणा-या माणसाचा पैसा माझ्या उदात्त कार्यास
नको" असे बोलून त्याना जाण्यास सांगतात. हिरमुसलेले पठ्ठे बापूराव निघून जातात.
अत्यंत
अडचणीच्या वेळी चालून आलेली मदत नाकारल्यामूळे सोबत असलेले कार्यकर्ते
बाबासाहेबांवर नाराज होतात व तसे बोलून दाखवितात. बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांवर खवळून उठतात, त्यांचा चेहरा रागाने लालबूंद होतो, नजरेत आग उतरुन येते, संताप्त बाबासाहेब घोग-या आवाजात म्हणतात, “तुम्हा
लोकाना लाज नाही वाटत? नितीमत्ता व स्वाभीमान नावाची चीज तुमच्यात आहे की नाही?
महाराच्या बायका नाचवून हा बामण पैसे कमवतो व तुम्ही मला असे पैसे घेण्यास सांगता?
माझे सत्याग्रही उपासी झोपले तरी बेहत्तर मी असा पैसा घेणार नाही.”
अशा प्रकारे चालून आलेली मदत नाकारणारे बाबासाहेब
आजच्या राजकीय दासाना आठवले असते तर भरून पावलो असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा